ज्वाला न्यूज
चामोर्शी प्रतिनिधी
चामोर्शी येथील रहिवासी तथा स्व. विमलताई ओल्लालवार हायस्कूल, पेटतळा (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) येथील मुख्याध्यापक डॉ. धिरज वसंतराव उराडे यांना दिल्ली येथील अत्यंत प्रतिष्ठित ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट संस्थेकडून “मानद डॉक्टरेट” ही सन्माननीय पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यशाबद्दल चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
समाजकारण, शिक्षण क्षेत्रातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच सामाजिक जाणीव जपणाऱ्या उपक्रमांमुळे डॉ. उराडे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत ग्लोबल ह्युमन राईट्स ट्रस्ट, दिल्ली यांनी त्यांना मानद डॉक्टरेट बहाल करून गौरविले आहे. या सन्मानामुळे चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
याच पार्श्वभूमीवर चामोर्शी पत्रकार समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ. धिरज उराडे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत शिक्षण, समाजप्रबोधन व मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. धिरज उराडे यांनी हा सन्मान केवळ वैयक्तिक नसून आपल्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा व समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे सांगितले. भविष्यातही शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करून समाजहिताचे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सत्कारमूर्ती मुख्याध्यापक डाॅ.धिरज उराडे , प्रतिष्ठीत नागरिक प्रांजीत वाकडे, रविंद्र उराडे सर, सामाजिक कार्यकर्ते बंडूजी कुळवे,चामोर्शी पत्रकार समितीचे उपाध्यक्ष बबनराव वडेट्टीवार, सचिव कालिदास बन्सोड, सहसचिव चंदू कुनघाडकर, कोषाध्यक्ष अयाज शेख, समिती सदस्य गजानन बारसागडे, अमित साखरे, नरेश सोमनकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी डॉ. उराडे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभामुळे चामोर्शी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास बन्सोड सर यांनी केले तर आभार गजानन बारसागडे सर यांनी मानले.





