ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
देसाईगंज:
देसाईगंजच्या कोंढाळा परिसरातील सिंड्राई येथे वैनगंगा नदीच्या घाटावर अवैध रेती उपसा करताना एका मजुराचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने महसूल प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आरोपींना पाठीशी घालत असल्याची चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
अपघाताची घटना: २५ जून रोजी सकाळी सिंड्राई रेतीघाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना, यंत्राखाली दबून विलास महादेव देवढगले (वय ३४, रा. जुनी वडसा) या मजुराचा जागीच मृत्यू झाला.
मुदत संपूनही उपसा: या रेतीघाटाच्या उपशाची मुदत ९ जून रोजीच संपली होती. तरीही घाट माफियांच्या ताब्यात कसा आणि कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रशासनावर संशय: मुदत संपल्यानंतरही घाट माफियांच्या हवाली कसा राहिला? प्रशासनातील कोणाचा यामागे हात आहे? अशा प्रश्नांची जोरदार चर्चा आता शहरात सुरू आहे.
कुटूंबावर दुखाचा डोंगर
या अपघातात जीव गमावलेले विलास देवढगले हे मजुरीसोबतच वाहनचालक म्हणूनही काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक चार वर्षांची चिमुकली असा परिवार आहे. विलास यांच्या निधनामुळे त्या चिमुकलीचे पितृछत्र हरवले असून, कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.
महसूल विभागाचे म्हणणे
याबाबत बोलताना देसाईगंजच्या तहसीलदार प्रीती दुडलकर म्हणाल्या, “९ जून रोजी रेतीघाटाची मुदत संपली होती. त्याच वेळी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे खोदून ठेवले होते, जेणेकरून कोणतेही वाहन नदीपात्रात जाणार नाही. मात्र, संबंधित लोक तिथे कसे काय पोहोचले, याची माहिती घ्यावी लागेल. अवैध रेती उपसा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही”.
चंद्रपूरच्या कंत्राटदाराची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, सिंड्राई घाटाचे कंत्राट चंद्रपूर येथील एका व्यक्तीला मिळाले होते. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या राजकीय पक्षात काम करणारी एक ‘जोडगोळी’ या कंत्राटामागे पडद्यामागून काम करत असल्याचे सूत्रांकडून समजते. ही जोडगोळी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चाही जोर धरत आहेत.





