ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनचक गावातील काही मजूर शेतमजुरीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. शेतमजुरीची कामे पूर्ण करून ते आपल्या गावाकडे परत येत असताना तेलंगणा राज्यातील टीजीएसआरटीसी (TGSRTC) बसने मजुरांना घेऊन येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात पवनचक गावातील चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे पवनचक गावावर शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
मृत मजुरांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व जखमींना योग्य उपचार मिळावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.





