ज्वाला न्यूज
संपादक मंगेश बन्सोड
दिल्ली:
ज्या देशात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत, त्याच देशात आज विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि युवा वर्गावर अत्याचार होत असल्याचे आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहेत.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, काहींचे हात मोडले तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
आंदोलकांचा असा देखील आरोप आहे की, जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्यात आले, त्यांच्या कपड्यांची ओढाताण करण्यात आली आणि त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी न्यायासाठी संघर्ष करत असून, त्यांना न्याय मिळण्याऐवजी दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ देशभरात विविध ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. आंदोलकांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
“आम्ही न्याय मागत आहोत, कोणताही उपकार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.”





