ज्वाला न्यूज
एटापल्ली प्रतिनिधी :
एटापल्ली : एटापल्ली पासून सुमारे 20 कि.मी. अंतरावरील हालेवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ 31 मे 2026 रोजी घडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी नवे आणि धक्कादायक दावे समोर आले आहेत.
सुरुवातीला ही हत्या समलैंगिक संबंधांच्या वादातून झाल्याचे समोर आले होते.मृतकाच्या कुटुंबीयांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळून लावत ही हत्या ब्लॅकमेलिंग आणि खंडणीशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मृत युवकाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद वय,32 वर्ष रा.नागेपल्ली, ता.अहेरी जिल्हा.गडचिरोली असे असून या प्रकरणातील आरोपी सूरज हलदार वय, 30 वर्ष रा.मिरगन ता.रायघर.जि. नबरंगपूर, ओडिशा असे आहे.
आरोपीने मृतकाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप
नागेपल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मृतकाचा भाऊ सारोज निषाद,मोठे भाऊ पवन बाथो तसेच चुलत भाऊ ब्रजकुमार निषाद यांनी घटनाक्रमाची माहिती देत कुटुंबीयांची भूमिका मांडली.त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने ” इन्स्टाग्राम ” वर एका मुलीच्या नावाने बनावट खाते तयार करून सतीशकुमारशी संपर्क साधला होता.
मुलीचा आवाज काढत विश्वास संपादन केल्यानंतर विविध कारणे पुढे करत त्याने पैशांची मागणी सुरू केली. कालांतराने ही मागणी ब्लॅकमेलिंगमध्ये परिवर्तित झाली आणि आरोपीने लाखो रुपये उकळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्यानंतरही पाठलाग सततच्या त्रासाला कंटाळून सतीशकुमारने आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता.त्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रमंडळी व नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला.
मृतकाचा शोध घेत तो आलापल्ली – नागेपल्ली परिसरात पोहोचला होता. घटनेच्या आदल्या दिवशी दोघांची भेट झाली होती.त्या वेळी सतीशकुमारने यापुढे ब्लॅकमेलिंग करू नये, अशी स्पष्ट सूचना आरोपीला दिली होती.त्यावर आरोपीने दिलगिरी व्यक्त केल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.
दुसऱ्याच दिवशी आरोपीने गोड बोलून सतीशकुमारला सोबत नेले आणि जंगल परिसरात चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला.
मोबाईल चॅट आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सादर पत्रकार परिषद घेऊन कुटुंबीयांनी मोबाईल चॅटिंगचे स्क्रीनशॉट,बँक व्यवहारांचे तपशील तसेच अन्य तांत्रिक पुरावे माध्यमांसमोर सादर केले.या पुराव्यांमधून प्रकरणाचा आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगशी संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे.
काही माध्यमांनी पुरेशी पडताळणी न करता या घटनेला वेगळे स्वरूप दिल्यामुळे कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सखोल चौकशीची मागणी
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सर्व संबंधित बाबी तपासण्यात याव्यात तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी कुटुंबीयांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले आरोप आणि दावे हे मृतकाच्या कुटुंबीयांचे म्हणणे असून, प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार.





