ज्वाला न्यूज
धानोरा : जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थाध्यक्ष तथा माजी मंत्री मारोतराव कोवासे, संस्थेचे सचिव तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यापैकी मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि वसतिगृह अधीक्षक भास्कर भोयर यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली.
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेची पाहणी केली. पाहणीदरम्यान अपुरी पलंगव्यवस्था, मच्छरदाणीचा अभाव, अस्वच्छ स्वयंपाकगृह आणि अशुद्ध पिण्याचे पाणी आढळून आल्याने मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांचे तीन महिन्यांत थर्ड पार्टी ऑडिट करण्याची घोषणा मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली आहे.
तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर प्रशासनाची कारवाई सुरू झाली असली, तरी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आता ठोस उपाययोजना कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.





