ज्वाला न्यूज
मुंबई:
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पूर्व येथील सुरम पार्क परिसरात राहणारा मयंक लोहार (वय २२) हा चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत असताना ही घटना घडली.
मुसळधार पावसामुळे डब्यात पाणी येत असल्याने मयंकने दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या एका प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. मात्र, या साध्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या आरोपीने आपल्या बॅगमधून धारदार शस्त्र काढून मयंकवर हल्ला केला.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंकला तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी बोरिवली स्थानकापूर्वीच ट्रेनमधून उडी मारून फरार झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे पोलिस (GRP) आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. तपासादरम्यान आरोपी रोशन सुवर्णा याला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मयंकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयंकच्या आईने आणि बहिणीने आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी भावना व्यक्त केली आहे.
लोकलमधील क्षुल्लक वादातून एका तरुणाचा जीव गेल्याने मुंबईच्या प्रवाशांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.





