ज्वाला न्यूज
ब्रह्मपुरी : सुंदरनगर परिसरात दारूच्या ग्राहकावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणाला तिघांनी घरातून बाहेर ओढून मारहाण केल्याची घटना १८ सप्टेंबरच्या रात्री घडली. यावेळी तरुणाला चाकूने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशांत मोघल डांगे (१८), रा. सुंदरनगर, ब्रह्मपुरी हे रात्री सुमारे ११ वाजता घरी जेवण करीत होते. त्यावेळी त्यांच्या वार्डातील दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद हे तिघे त्यांच्या घरी आले. गडचिरोली जिल्ह्यातील ग्राहकांना दारूचा माल का पुरवित आहात, असा जाब त्यांनी ईशांत यांना विचारल्याने वाद निर्माण झाला.
वाद वाढल्यानंतर तिघांनी ईशांत यांना घराबाहेर ओढून सार्वजनिक रस्त्यावर आणल्याचा आरोप आहे. यावेळी मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली तसेच “जिथे भेटशील तिथे चाकूने मारून टाकीन”, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करून ईशांत यांची सुटका केली.
घटनेनंतर प्रकृती ठीक नसल्याने आणि भीतीमुळे ईशांत तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊ शकले नाहीत. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी त्यांनी ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलिसांनी दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३३३, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





